27 July 2013

पर्यटनातून आर्थिक विकासाच्या मार्गावर...

कांही वर्षांपूर्वी पावसाळा सुरू होताच गोव्यातील पर्यटनाला मरगळ यायची. पावसाला ‘ऑफ सिझन’ ठरवून स्वत:हून येतील त्या पर्यटकांवर समाधान मानले जायचे. आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही गोव्यातला पर्यटन हंगाम बहरू लागला आहे. पूर्वी ५ ते १० टक्के असणारे हॉटेल आरक्षण आता ६० ते ७० टक्क्यांवर जाऊन पोचले आहे. गोवा सरकारने पावसाळी पर्यटनाच्या केलेल्या मार्केटिंगची चांगली फळे सध्या पर्यटन व्यावसायिकांना चाखायला मिळत आहेत.



ऑक्टोबरपासून मेअखेरपर्यंत गोव्याचा पर्यटन हंगाम ऐन बहरात असतो. डिसेंबरअखेर सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशांतील लाखो पर्यटक गोव्याला पसंती देऊ लागले आहेत. सोनेरी वाळूचे आणि माडा-पोफळीच्या बागांची झालर असलेले गोव्यातील किनारे देश-विदेशांतील पर्यटकांना गोव्यात खेचून आणत आहेत.



किनारी पर्यटनाला जोडून पर्यटन वृद्धीस हातभार लागेल असे अनेक उपक्रम गोवा सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून हाती घेतले आहेत. रस्ते, विमान आणि रेल्वेने देशातील प्रमुख शहरांशी गोवा जोडले गेले असल्याने ‘विकएंड’ साजरा करण्यासाठी गोव्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कॉर्पोरेट जगतात गोवा हे ‘विकएंड डेस्टीनेशन’ म्हणून लोकप्रिय होऊ लागले आहे. गोव्यातल्या पार्टीची मजा काही औरच असते. विकएंड असो अथवा डिसेंबरअखेरचे दिवस असोत; ठिकठिकाणी पार्ट्या आयोजित करून गोव्यातील प्रत्येक क्षण ‘यादगार’ करण्याची संधी पर्यटक शोधत असतात. त्यातूनच गोवा हे ‘पार्टी डेस्टीनेशन’ बनू लागले आहे.

देश आणि विदेशांतील नवदांपत्यांना गोवा नेहमीच खुणावत असतो. गोवा हे फार पूर्वीपासून ‘हनिमून डेस्टीनेशन’ म्हणून सर्वत्र परिचित आहे. पावसाळ्यात अनेक नवदांपत्ये ‘हनिमून’ साजरा करण्यासाठी गोव्यात येत असतात. सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून ही संधी कॅश करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘हनिमून पॅकेज’ला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे. गोव्यातील पर्यटनस्थळांची सैर आणि सवलतीच्या दरात जीटीडीसीच्या रेसिडेन्सीमध्ये मुक्काम करण्याची संधी पर्यटकांना या पॅकेजमधून घेता येते. हंगामापेक्षा हे दर बरेच कमी असल्याने गोव्यातील पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटन खात्याचे ‘हनिमून पॅकेज’ लोकप्रिय होऊ लागले आहे. जूनमध्ये जीटीडीसीच्या रेसिडेन्सीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे. व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार एक वेगळा अनुभव देणारा ठरत असल्याने साहसी पर्यटक त्याकडे वळू लागले असल्याचे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांचे मत आहे.

सोनेरी वाळूच्या किनार्‍यांवर फेसाळत येऊन धडकणार्‍या लाटा, हिरवागार शालू नेसून नटलेले डोंगरमाथे, कड्यांवरून फेसाळत कोसळताना आपल्या तुषारांनी प्रत्येकाच्या मनाला आणि शरीराला प्रफुल्लित करणारे धबधबे, गोव्यातील पर्यावरणाची श्रीमंती दाखवणारी अभयारण्ये, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारे सण-उत्सव, तृप्तीचा ढेकर देणारे रुचकर जेवण यांचा आस्वाद घेण्यासाठी, विशेष करून पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या देशी पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पूर्वी ऑफ सिझन म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या पावसाळ्यात आता पर्यटन हंगाम बहरू लागला आहे.



गोव्यात येणारे पर्यटक किनार्‍यांव्यतिरिक्त गोव्यातील इतर पर्यटनस्थळांकडे वळावेत यासाठी गोवा सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. दुर्लक्षित पर्यटनस्थळांचा विकास करून तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. हरवळेच्या धबधब्याचा विकास आणि परिसराचे सौंदर्यीकरण हा त्याचाच एक भाग आहे. हरवळे धबधबा नेहमीच पावसाळी पर्यटकांना खुणावत असतो. तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटक त्याचा आस्वाद घेतील हे जाणून पर्यटन खात्याने हरवळे धबधबा परिसराचे सौंदर्यीकरण केले आहे. नुकतेच पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन झाले आहे. मये तलाव परिसराचा विकास करून तिथेही पर्यटकांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे.

चोर्ला घाटातील धबधबे ओसंडून वाहू लागल्याने स्थानिक आणि देशी पर्यटक तेथील धुक्यात हरवून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. दूधसागर धबधब्याचा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आजही हजारो पर्यटकांची पावले दूधसागर धबधब्याकडे वळत असतात. रेल्वेतून जातानाही धबधब्याचे उडणारे तुषार अंगार घेण्यासाठी प्रवासी धडपडत असतात. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यासह नेत्रावळी आणि म्हादई अभयारण्यातही निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार पाहायला मिळतो. त्याशिवाय खासगी संस्थांनी उभारलेली स्पाइस फार्म ही संकल्पना पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण एंजॉय करण्याची संधी सर्वच स्पाइस फार्ममध्ये पर्यटकांना मिळते.

आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला साहसी पर्यटनाचा भाग म्हादईतील व्हाइट वॉटर राफ्टिंगने पूर्ण झाला आहे. गेल्यावर्षी सुरू झालेला हा उपक्रम आवड असलेल्या पर्यटकांच्या पसंतीस पडू लागला आहे. एका वेगळ्याच थराराचा अनुभव व्हाइट वॉटर राफ्टिंगमुळे पर्यटकांना येऊ लागला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याने ज्यांना पोहता येत नाही अशांनासुद्धा या थराराचा अनुभव घेता येणे शक्य होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. देशी आणि विदेशी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून या साहसी पर्यटनाचा लाभ घेताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीतही पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्राला वेगळा आयाम देण्याचे सरकारने ठरवले आहे. आता गोव्यात येणार्‍या पर्यटकांना गोव्याच्या पर्यटनस्थळांचा नजराणा हवाई सफर करून पाहता येणार आहे. पाण्यावर आणि हवेत चालणार्‍या ऍम्फिबियन विमानाच्या माध्यमातून पर्यटकांना हवाई आणि समुद्री सैर घडवून आणली जाणार आहे.

किनार्‍यांवर समुद्रस्नानासाठी येणार्‍या पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने धाराशॉ कंपनीतर्फे किनार्‍यांवर शौचालये आणि चेंजिंग रुम्स उभारण्याचे ठरवले आहे. गोव्यातील प्रमुख अशा सर्व किनार्‍यांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोव्यासारख्या जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी परिषदा आयोजित केल्यास त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याचे आढळून आल्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था परिषदांच्या आयोजनासाठी गोव्याची निवड करतात. मोठ्या परिषदांच्या आयोजनाला प्रोत्साहन मिळावे व आयोजकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरच जागतिक दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर उभारले जाणार आहे. त्यातून कॉर्पोरेट पर्यटनाला चालना मिळू शकेल.

पर्यटन व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ गोव्यातच तयार व्हावे यासाठी फर्मागुडी येथे अद्ययावत हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहे. याशिवाय पणजी जेटी, पार्किंग प्लाझा आणि पर्यटन भवनसारखे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन वर्षाचे ३६५ दिवस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याचे सरकारने ठरवले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन खात्याच्या राज्यस्तरीय मार्केटिंग आणि प्रोत्साहन समितीच्या बैठकीतही पर्यटकांच्या हिताचा विचार करून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ‘अपना मॅप’ही त्याचाच एक भाग आहे. त्याद्वारे गोव्याच्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी मार्ग दाखवले जाणार आहेत. नॅशनल जिऑग्रामी हे आंतरराष्ट्रीय चॅनल गोव्यातील संस्कृती, पर्यटन, पुरातत्त्व वास्तू आदींवर ३० मिनिटांचा माहितीपट तयार करणार आहे. नॅशनल जिऑग्राफीची टीम त्यासाठी ४५ तासांचे शुटिंग करणार असून त्याचे संपादन करून ३० मिनिटांचा माहितीपट बनवला जाणार आहे. हा माहितीपट जगभरात प्रसारित केला जाणार आहे. नॅशनल जिऑग्राफीची प्रेक्षक संख्या जास्त असल्याने त्याचा गोव्याच्या पर्यटनाला फायदाच होणार आहे. डिस्कव्हरी इंडिया व इतर आघाडीच्या पर्यटनविषयक मासिकांतून, नियतकालिकांमधून गोव्यातील पर्यटनस्थळांची माहिती सर्वदूर पोहोचेल यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला मिळणारा प्रतिसाद अपेक्षा वाढवणारा आहे.
पर्यटन खात्याने हॅरिटेज फॅस्टीव्हल, वाइन फॅस्टीव्हल, गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टसारख्या उपक्रमांतून पर्यटकांसमोर जाण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे आयोजन केले जाणार आहे. म्युझिक शो व इतर कार्यक्रमांवेळी गोवा, नो टू ड्रग्ज, ग्रीन गोवासारखे संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पर्यटन खाते व महामंडळाने केला आहे.



प्रभावी आणि आक्रमक मार्केटिंगचा फायदा गोव्याला होऊ लागला आहे. देशी पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी आठ रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. रोड शोमधून गोव्यातील पर्यटनस्थळांबरोबर सांस्कृतिक वैभव त्या-त्या ठिकाणच्या लोकांसमोर मांडून पर्यटकांना गोव्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विदेशातही बर्लीन, फ्रँकफर्ट जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, मलेशिया, थायलंड, फिनलँड, नॉर्वे, इंग्लंड, स्पेन, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये रोड शो करून विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने यावेत यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. गोवा पर्यटन खाते व महामंडळ आंतरराष्ट्रीय पर्यटन जत्रा व मेळाव्यांमध्येही भाग घेणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ओटीडीव्हायकेएच लेजर-मॉस्को, आयएफटीएम- पॅरिस, आयटीबी एशिया- सिंगापूर, डब्ल्यूटीएम- लंडन, आयटीबी- बर्लिन व एमआयटीटी मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय पर्यटन जत्रांमध्ये गोव्यातील पर्यटनस्थळांचे आक्रमक मार्केटिंग केले जाणार आहे. गोव्यातील पर्यटनाच्या येणार्‍या हंगामात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खाते व महामंडळाने देशी पर्यटन जत्रा व मेळाव्यांमध्ये भाग घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यात टीटीएफ, आयटीएम, आयआयटीएम, हॉलिडे एक्स्पो, आयटीटीई, हिंदू ट्रॅव्हल डिस्कवर, साठे व इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये गोवा पर्यटन खाते आपले दालन उघडून मार्केटिंग करणार आहे.

गोव्यातील पर्यटनस्थळांचे प्रभावी मार्केटिंग आणि सादरीकरण करण्यासाठी मुंबईतील ऍडफॅक्टर पीआर या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट व प्रसिद्धी माध्यमांमधून गोव्याची चांगली प्रतिमा पोचवण्याचा प्रयत्न या कंपनीतर्फे केला जातो.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्तिशः पर्यटन खात्यात लक्ष घातले आहे. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारून रोजगारनिर्मिती करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.



पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी नुकतीच केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजिवी यांची भेट घेऊन गोव्यातील पर्यटन क्षेत्रात हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. केंद्राकडून सहकार्य मिळाल्यास आणखी सुविधा निर्माण करून आधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद गोव्यात असल्याचे परुळेकर यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सरकारने पर्यटन खात्यामार्फत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा भविष्यात गोव्यात फायदा होणार असून गोव्यात येणार्‍या प्रत्येक पर्यटकाची गोवा भेट संस्मरणीय करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली आहेत.

पर्यटन क्षेत्रात गोव्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी घेण्यात आली आहे. अलीकडेच लोनली प्लॅनेट ट्रॅव्हल मॅगझिनतर्फे गोवा पर्यटनला बेस्ट व्हॅल्यू डेस्टीनेशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ट्रॅव्हल प्लस लेजर इंडिया या मॅगझिनतर्फे गोवा पर्यटनला बेस पार्टी डेस्टीनेशन, बेस्ट हनिमून डेस्टीनेशन व बेस्ट लेजर डेस्टीनेशन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातील ही गौरवशाली कामगिरी यापुढेही कायम राहील यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे.
लवकरच वर्षाचे ३६५ दिवस पर्यटन हंगाम असणारे पहिले राज्य गोवा असेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. गोव्यात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. पर्यटन व्यवसायातील उलाढालही वाढत असून येत्या काही वर्षांत पर्यटन हा निश्‍चितपणे गोव्याचा आर्थिक कणा बनेल यात शंका नाही.

06 July 2013

पावसाळ्यातील भ्रमंतीची...

पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटूनही गेलेत. पर्यटनाची आवड असलेल्यांना आता पावसाळ्यातील भ्रमंतीचे वेध लागले असतील तर नवल ते काय? कारण मित्रांनो, पर्यटनाची-भ्रमंतीची आवड असलेल्यांनी केवळ उन्हाळ्यातील किंवा हिवाळ्यातील पर्यटनाच्या मर्यादेत राहण्याचे दिवस आता संपलेत.



जग बदलते तशी पर्यटनाची व्याख्याही बदलत जाते. पूर्वीची संकल्पना अशी होती की पर्यटन हवे पण ते उन्हाळ्यात एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, तर हिवाळ्यात इतर ठिकाणी. पण पावसाळ्यात भ्रमंती मुळीच नको. कारण काय, तर पावसाळ्यात पर्यटनाला निघायचे म्हणजे रेनकोट, रेन चीटर, पावसाळ्यात वापरण्याचे बूट वगैरेंबरोबरच सर्दी-पडसे होईलच असे गृहीत धरून बरोबर न्यावयाची औषधांची बॅग वगैरे नसत्या कटकटी... त्यापेक्षा संपूर्ण पावसाळा शक्यतो घरीच टी.व्ही., सुका मेवा, चहा-कॉफी, भजी-सामोसे यांच्यासह साजरा करणे किती चांगले.

पण मित्रहो, असे केल्याने आपण निसर्गाची केवळ एकच बाजू अनुभवू शकतो. पावसाच्या आगमनाला आसुसलेली ही सृष्टी पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर किती सुंदर आणि मनमोहक रूप धारण करू लागते हे सर्वांना माहीत असतेच. अशावेळी आजूबाजूला अलौकिक आणि अवर्णनीय अशा निसर्गनिर्मितीचा आविष्कार घडत असतो. सृष्टीचे हे देखणे रूप आपल्याला अनुभवायला नको का?



पावसाळ्यात आपल्या येथील कितीतरी पर्यटनस्थळांवरील, समृद्ध पठारांवरील हिरवळीचे गालीचे सुंदर-सुंदर रानफुलांनी मढलेले असतात. एखादे पर्यटनस्थळ उंच ठिकाणी असल्यास तेथील धबधबे आणि त्यांच्या भरभरून वाहणार्‍या आणि कानठळ्या बसवणार्‍या जोरदार प्रवाहाचे दर्शन घडल्यास उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अगदी आपल्या साळावली येथील ठिकाणी पावसाळ्यात तेथील निसर्गसौंदर्यामध्ये भर घालणार्‍या कारंज्यांच्या विरुद्ध बाजूला वाहणार्‍या धरणाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाला पाहून धडकी भरते तशी!



याशिवाय पावसाळ्यात ठिकठिकाणी एखाद्या उंचवट्यावरून नव्याने निर्माण होणारे अनेक छोटे-मोठे झरे वाहत असतात आणि आपल्याला प्रसन्न करीत असतात. याबरोबरच सृष्टीमध्ये एखादे वेळी चालणारा ऊन-पावसाच्या लपंडावाचा खेळ, अधून-मधून आपल्या दृष्टिपथात येणारे इंद्रधनुष्य... हे सारे किती नयनरम्य असते हे वेगळे सांगायची गरज नाही. पावसाळ्यात एखादेवेळी विमानप्रवास घडल्यास केवळ ‘टेक-ऑफ’ आणि ‘लँडिंग’चे क्षण सोडल्यास संपूर्ण प्रवासात आपल्याला ढगांच्या साम्राज्यांतून जाण्याचा, एका वेगळ्याच अनुभवाचा साक्षात्कार घडतो.

 

आपण भारतीय खरोखरच फार नशीबवान आहोत. आपल्या इथे पर्यटनासाठी कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. हिमालयाच्या कुशीतील बर्फाच्छादित शिखरे तेथून दूरच्या स्थानांवरील आपल्यासारख्यांना पर्यटनासाठी खुणावत असतात, तर आपल्या येथील असंख्य समुद्रकिनारे येथील लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात. ज्या स्थळांवरील आपल्या देशबांधवांना समुद्रकिनारे दुर्मीळ असतात त्यांना येथील समुद्रकिनार्‍यांवर आल्यानंतर समोर अथांग सागर बघून केवढा आनंद होत असतो हे आपल्यासारख्या स्थानिकांनी कितीतरी वेळा आपल्या समुद्रकिनार्‍यावरील वाळूत बसून अनुभवले असेलच. म्हणजे, अगदी आपल्याला हिमशिखरे किंवा राजस्थानातील वाळवंटाचे क्षेत्र बघून होतो, तसा आनंद नाही का?


एक मात्र खरे, पावसाळ्यात पर्यटनाला निघायचे झाल्यास आपले प्रवास माध्यम आरक्षित करण्याच्या संदर्भात विशेष अडचण येत नसते. पावसाळ्यात पर्यटक कमी संख्येने येत असतात हे ओळखून निवास सुविधेमध्येही ‘ऑफ-सीझन’ डिस्काउंट्‌स दिले जातात. यातच सारे काही आले.

पावसाळ्यात भ्रमंतीला निघायचे झाल्यास काही गोष्टींचे भान अवश्य राखायला हवे. आपली स्वतःची गाडी घेऊन निघायचे झाल्यास गाडीचे सर्व टायर्स सुस्थितीत पाहिजेतच. गाडीचे संपूर्णपणे चेक-अप किंवा योग्यती दुरुस्ती करून घेऊन गाडीने प्रवास करणे केव्हाही चांगलेच. प्रवासामध्ये छत्री, रेनकोट, पावसाळी बूट यांबरोबरच ‘चार्ज’ करता येण्याजोगी प्रखर विजेरी जवळ असणे जरुरीचे वाटते. आपला प्रवास शक्यतो दिवसाचा असावा, रात्रीचा अजिबातच करू नये. याचे कारण म्हणजे, काही वेळा प्रवासाचा रस्ता आपल्याला परिचित नसतो. त्यातच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्याचा नीट अंदाज बांधणे कठीण होऊन जाते. एखाद्या बस, ट्रक किंवा इतर अवजड वाहनाला वाट करून देताना याचा आपल्याला जास्त त्रास होतो. त्यातच रस्त्यावरील दिवे पेटत नसतील तर विचारूच नका. आपल्या येथे तर ही बाब नित्याचीच असते नाही का? आणि महत्त्वाचे म्हणजे, रात्रीचा एकसारखा प्रवास केल्यास आपल्याला विश्रांती कधी घेता येणार? म्हणूनच काळजी घेणे चांगले.

याशिवाय आपल्या भ्रमंतीमध्ये आणखी काही गोष्टींपासून फार जपले पाहिजे. पावसाळ्यात ठिकठिकाणचे धबधबे, समुद्रकिनारे वगैरे आपल्याला आकर्षित करीत असतात. पर्यटनाविषयक कायद्याच्या मर्यादेत राहून पर्यटनाचा आनंद मिळविल्यास आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना किंवा सहपर्यटकांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे त्रास किंवा मनस्ताप होणार नाही. आपल्या येथे समुद्रात वर्षाकाठी कितीतरी पर्यटक बुडून मृत्यू पावतात. याची प्रमुख कारणे म्हणजे पाण्याचा योग्य अंदाज नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरणे, पोहण्याच्या तंत्रात कमी पडणे आणि तिसरी जीवघेणी ठरणारी गोष्ट म्हणजे दारू पिऊन किंवा अमली पदार्थांचे सेवन करून समुद्रामध्ये उतरणे.

याशिवाय इतर काही गोष्टींचाही खास उल्लेख करावा लागेल, त्यांमध्ये समुद्रात किंवा समुद्रकिनार्‍यावर पाळावयाच्या शिस्तीचा अभाव, आणि हे नियम आणि शिस्त पाळावयाच्या संदर्भात स्थानिक संबंधित यंत्रणेचे योग्य नियंत्रण नसणे, समुद्रकिनार्‍यावर बेकायदेशीर विकली जाणारी दारू किंवा अमली पदार्थ, पर्यटकांच्या गर्दीच्या तुलनेने अगदी कमी संख्येने उपलब्ध किनार्‍यावरील जीवरक्षक वगैरे-वगैरे. त्यामुळे येथील सुंदर किनारे काही वेळा जीवघेणेही ठरू शकतात याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे.



तर मग चला... तयारी करा... या पावसाळ्यातील भ्रमंतीची...

Popular Posts